अनंत विचार न्यूज दिनांक 10/9/2025
पंढरपूर- राज्य सरकारने जेष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली, मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यभरातील वृध्दांनी पंढरीत सन्मान यात्रा काढत संत नामदेव पायरी येथे अकरा हजार पत्र ठेवत सरकारला सद्बुध्दी दे अशी प्रार्थना केली.
अर्थक्रांती जीवन गौरव अभियान अंतर्गत पंढरपूर येथे सन्मान वारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष घनश्याम दायमा यांनी माहिती दिली की, निवडणुकीच्या तोंडावर जेष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा विद्यमान सरकारने केली होती. मात्र याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही. यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी तसेच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यभरातून लाखो पत्र पाठविण्यात येणार आहेत. यापैकी प्रातिनिधीक स्वरूपात अकरा हजार पत्र संत नामदेव पायरी येथे ठेवण्यात आली. तसेच सरकारला याबाबत निर्णय घेण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. येत्या काळात सरकारवर पत्रांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा यावेळी दायमा यांनी दिला. जेष्ठ नागरिकांना महिना 7 हजार रूपये पेन्शन मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली.
दरम्यान या सन्मान वारीमध्ये सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ सहभागी झाले होते. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून प्रदक्षिणा मार्गावर फेरी काढून घोषणाबाजी केली.
